विमान दुर्घटनेतील मृतांना क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली   

लंडन : अहमदाबादमधील भीषण विमान दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाल्याने देशभरात शोककळा पसरली आहे. एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर पाच मिनिटांनी कोसळले आणि एका हॉस्टेलवर पडले.एअर इंडियाचे हे विमान लंडनला जात होते, ज्यामध्ये २४२ लोक होते. या सर्व प्रवाशांपैकी फक्त एकच वाचला, उर्वरित २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाला हादरवून टाकले. याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटपटूंनी श्रद्धांजली वाहिली. तर लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये एक भावनिक क्षण पाहायला मिळाला.
 
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. हा अंतिम सामना इंग्लंडमधील लॉर्ड्स स्टेडियमवर रंगला आहे, या सामन्यात सर्व खेळाडू आणि पंचांनी त्यांच्या हातावर काळी पट्टी बांधली आहे. याद्वारे या अपघातात जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. भारत या सामन्याचा भाग नाही, परंतु भारतातील या अपघाताने सर्वांनाच दुःख दिले आहे.
 
भारतीय क्रिकेट संघही कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला गेला आहे. आज, १३ जूनपासून भारत आणि भारत अ संघात संघांतर्गत सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल, केएल राहुल, रवींद्र जडेजा यांच्यासह सर्व खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. यासोबतच अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक मिनिट मौन पाळण्यात आले. 

Related Articles